write.as

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अंत्योदय लाभार्थ्यांना वाढीव अन्नसाठा मंजूर* 2 व 3 रूपये किलो दराने धान्य मिळणार अतिरिक्त इष्टांकाची मागणी पूर्ण

चंद्रपूर दि. १४ ऑगस्ट

राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पं. दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान प्रभावीपणे राबविण्याकरिता चंद्रपूर जिल्हयाला वाढीव अन्नधान्य साठा मंजूर करण्यात आला आहे. जिल्हयातील सर्व पात्र लाभार्थ्यांना याचा आता लाभ मिळणार आहे.

चंद्रपूर जिल्हयासाठी 30,561 अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांच्या व 1,11,608 एवढया प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांच्या अतिरिक्त इष्टांकाची मागणी पूर्ण झाली आहे. या संदर्भात 14 ऑगस्ट 2019 रोजीच्या अन्न, नागरी, पुरवठा व विभागाचे सहसचिव स. श्री. तुपे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना याबाबत निर्देशित केले आहे. चंद्रपूर जिल्हयात यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली होती.

पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ व्हावा, याकरिता अंत्योदय अन्न योजनेचे व प्राधान्य कुटूंबाचे लाभार्थी निवडण्याबाबत सर्व संबंधितांना सूचित करण्यात आले आहे. 15 जुलै रोजी या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात वरील प्रमाणे अतिरिक्त इष्टांकाची मागणी जिल्हा पुरवठा विभागाने केली होती. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सदर मागणी पूर्णत्वास आली आहे. चंद्रपूर जिल्हयातील अस्तित्वात असलेल्या शिधापत्रिकाची छाननी करून त्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसाठी अपात्र असलेल्या शिधापत्रिका इतर शिधापत्रिकांमध्ये वर्ग करण्यात याव्यात तसेच अंत्योदय अन्न योजनेमध्ये शिधापत्रिकांचा समावेश करताना प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांमध्ये सद्यःस्थितीत असलेल्या पिवळया शिधापत्रिकांना प्राथम्य द्यावे, असे शासनातर्फे सुचित करण्यात आले आहे. दिनांक 1 सप्टेंबर 2019 पासुन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांना केवळ पीओएस मशीन द्वारे अन्नधान्याचे वाटप करण्यात यावे, असे निर्देशही शासनातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना 2 व 3 रूपये दराने धान्य उपलब्ध होणार असून गरीब नागरिकांना मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे. चंद्रपूर जिल्हा शंभर टक्के एलपीजी गॅसयुक्त करण्याचा निर्धार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यादृष्टीने सुध्दा कार्यवाही प्रगतीपथावर आहे. अधिक माहिती साठी वाचा http://sudhirmungantiwar.blogspot.com/p/mahtvan.html