write.as

बचत गटांमार्फत आर्थिक सत्याग्रहाची जिल्हयात सुरुवात करा : ना. सुधीर मुनगंटीवार/ जिल्हयातील ४ थ्या बांबू कौशल्य ( भाऊ ) केंद्राचे मूलमध्ये लोकार्पण/ ट्रान्सप्लांटर मशीन, पीक व्हॅनचे बचत गटांना वाटप/ पालकमंत्री बांबू समृध्दी अभियान अंतर्गत बांबू रोप वाटप/ डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजीच्या नव्या तुकडीला साहित्य वाटप

मूल ( चंद्रपूर ) दि. २७ जुलै : जिल्ह्यात बचत गटांमार्फत विषमता दूर करण्यासाठी बचत गटांचा आर्थिक सत्याग्रहाला सुरुवात करा. त्यासाठी जिल्ह्यामध्ये कौशल्य विकासातून कार्यप्रवण झालेल्या महिला बचत गटांच्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. महिलांमध्ये कौशल्य विकासाचे नवीन मॉडेल म्हणून उदयाला आलेल्या 'भाऊ 'या बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या चौथ्या केंद्राचे मूल येथे त्यांनी आज लोकार्पण केले.

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने मूल येथे जिल्ह्यातील चौथ्या बांबू हँडीक्राफ्ट अँड आर्ट युनिटच्या ( भाऊ ) लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी बॅचचा तिसऱ्या तुकडीला साहित्य वाटप करण्यात आले. पालकमंत्री बांबू समृद्धी अभियानांतर्गत शेतकऱ्यांना बांबू रोपांचे वाटप करण्यात आले. नगरपरिषद मूल स्वच्छ संरक्षण 2019 मध्ये भारतात ३ क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर महिला बचत गटांना बांबू प्रशिक्षणांतर्गत साहित्यांचे किट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य वनसंरक्षक एस. वि. रामाराव, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, मुलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, पंचायत समिती सभापती पुष्पाताई डाहणे, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले, मूल नगरपालिकेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, महिला विकास आर्थिक मंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित महिला जनसमुदायाला पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रक्षाबंधन य सणाच्या शुभेच्छा दिल्या. भाऊ युनिट लोकार्पण करताना हा भाऊ आपल्या कायम पाठीशी राहील अशी ग्वाही देत यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी महिला बचत गटांचा संदर्भात महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या जिल्ह्यातील प्रयत्नांचे कौतुक केले. सोबतीला महिलांच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने गेल्या तीन वर्षात संचालक राहुल पाटील यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या कौशल्य विकास अभियानाचे कौतुक केले. महाराष्ट्रासाठी हे काम अनुकरणीय असून जिल्ह्यात बचत गटांची मोहीम आणखी सक्रिय करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्ह्यामध्ये महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी पुढे यावे. हवी ती मदत करू ,अशी ग्वाही यावेळी दिली. उपस्थित महिलांना देखील त्यांनी आवाहन केले की, महिला बचत गटांच्या मार्फत आर्थिक विकास साधण्यासाठी त्यांनी देखील एक पाऊल पुढे यावे, भाऊ हे चौथे युनिट जिल्ह्यांमध्ये सुरू झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यामार्फत बांबू पासून तयार होणाऱ्या वस्तूंना मोठी बाजारपेठ मिळावी व आपल्या वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात विकल्या जाव्यात .यासाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने बाजाराचा अभ्यास करणारी टीम तयार करावी, असे आवाहन केले.

महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे सर्वात महत्त्वाचे असून यासाठी श्रीमती सुमतीताई सुकळीकर योजनेअंतर्गत शून्य दराने कर्ज वाटप केले जात आहे. अल्पसंख्यांक समुदायासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत गट सुरू करण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी जिल्ह्यामध्ये सुद्धा एक योजना तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून महिलांनी याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.

यावेळी त्यांनी महिलांना मदत करणाऱ्या अनेक योजना जिल्ह्यांमध्ये सुरू असून जिल्ह्यात कुक्कुट पालना संदर्भात पोंभुर्णा येथे एक कंपनी सुरू करण्यात आली आहे.आता पोंभुर्णा येथे सुरू केलेल्या कंपनीच्या विस्तार करण्यात येणार असून सध्या महाराष्ट्राला तीन कोटी अंडी आहारात लागतात. त्यापैकी दोन कोटी अंडी आयात करावी लागतात. महिला बचत गटांनी कुक्कुटपालन व्यवसायामध्ये देखील पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसाय वाढावा यासाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. अनेक योजना दृष्टिपथात असून या नव्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. सोमनाथ येथे यावर्षीपासून कृषी विद्यापीठ सुरू होत असून या ठिकाणी आणि आपल्या भागातील शेतीचा संपूर्ण अभ्यास केला जाणार आहे.या ठिकाणच्या जमिनीची पोत, या ठिकाणी होणारी पिके या सर्वांचा अभ्यास केला जाईल व या मार्फत या भागातील कृषी क्रांतीला सुरूवात होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या उत्साहवर्धक कामाने आपण प्रभावित झालो असल्याचे सांगून त्यांनी आपल्या बांबू प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत तयार झालेल्या अनेक वस्तू प्रधानमंत्री यांच्या कार्यालयापासून तर मोठ्या सेलिब्रिटींच्या घरात पोहोचल्या असल्याचे सांगितले. पुढच्या काळात या प्रशिक्षणाच्या मार्फत राज्यभर या वस्तू पोहोचाव्यात, अशी अपेक्षा देखील त्यांनी केली.

मूल रेल्वे स्थानक सजविणार

संपूर्ण भारतातील आकर्षक असे दोन रेल्वे स्टेशन म्हणून चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्टेशनचे नावलौकिक आहे. मात्र आता मूल रेल्वे स्थानकही भारतीय रेल्वेच्या आकर्षक रेल्वेस्थानकाच्या यादीत आले पाहिजे,असे निर्देश आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. मुल रेल्वेस्थानकाची सौंदर्यीकरण करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला परिसरातील हजारो महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन माविमचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे यांनी केले. अधिक माहिती साठी वाचा http://sudhirmungantiwar.blogspot.com